संघर्षावर मात करून स्वप्नांना दिले यशाचे पंख!

मजूर हनुमंत चौरे यांच्या चार सख्ख्या मुलींची मुंबई पोलीस दलात भरती; जिवाचीवाडीसह महाराष्ट्राचा अभिमान

 

बीड | केज तालुका

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील कु. उषा हनुमंत चौरे, कु. अर्चना हनुमंत चौरे, कु. शीतल हनुमंत चौरे आणि कु. गीतांजली हनुमंत चौरे या चार सख्ख्या बहिणींनी आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात भरती होण्याचा मान मिळवला आहे. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून वाटचाल करत मिळवलेले हे यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

त्यांचे वडील हनुमंत चौरे आणि आई हे वर्षानुवर्षे ऊसतोड मजूर म्हणून कष्ट करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पशुपालन करूनही त्यांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. “मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे,” हा त्यांचा निर्धारच आज या ऐतिहासिक यशामागील खरी ताकद ठरला.

चारही बहिणींनी शिक्षणासाठी वसतिगृहात राहून पोलीस भरतीची तयारी केली. नियमित अभ्यास, कठोर शारीरिक सराव आणि अविरत मेहनतीच्या बळावर त्यांनी एकाच वेळी मुंबई पोलीस दलात स्थान मिळवले.

आपल्या भावना व्यक्त करत हनुमंत चौरे म्हणाले, “आयुष्यभर कष्ट केले, पण मुलींना शिकवण्याचा निर्धार कधी सोडला नाही. आज आमच्या चारही मुली पोलीस दलात दाखल झाल्या, यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही.”

एकाच कुटुंबातील चार सख्ख्या बहिणींची एकाच वेळी पोलीस दलात भरती होणे ही दुर्मीळ आणि अभिमानास्पद घटना आहे. त्यांच्या या यशामुळे जिवाचीवाडी गाव, केज तालुका आणि बीड जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गौरवाने घेतले जात आहे.

ही यशोगाथा प्रत्येक तरुण-तरुणीला एकच संदेश देते—

“परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते.”

 

कु. उषा हनुमंत चौरे, कु. अर्चना हनुमंत चौरे, कु. शीतल हनुमंत चौरे आणि कु. गीतांजली हनुमंत चौरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳👮

 

संदिप बबनराव धात्रक – सहाय्यक संपादक

मो ९४२००००९४२

शिवनेरीच्या सुपुत्राची भारतीय सेनेत गौरवशाली भरारी !

कर्नल विक्रम सुधीर बेनके यांची ब्रिगेडियर पदावर नियुक्ती; जुन्नर तालुक्यासह खानदेशा कसमादे विभागात आनंदाचे वातावरण

नाशिक | संदिप धात्रक – ९४२००००९४२
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पवित्र किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जन्मलेल्या *कर्नल विक्रम सुधीर बेनके* यांनी भारतीय सेनेत आपल्या कर्तृत्वाची आणखी एक ऐतिहासिक छाप उमटवत ब्रिगेडियर पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


देशसेवा, शिस्त आणि नेतृत्वाच्या बळावर *ब्रिगेडियर* पदापर्यंत पोहोचलेल्या विक्रम बेनके यांच्या यशामुळे तरुण पिढीला भारतीय सैन्यात करिअर करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल शेतकरी संघटनेचे नेते तानाजी बेनके, माजी आमदार स्व. वल्लभ बेनके यांच्या पत्नी राजश्री बेनके, जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके, डॉ. अमोल बेनके, गौरी बेनके, धनश्री बेनके, डॉ. पल्लवी बेनके, योगेश बेनके, सुधीर फुलवडे, विनायक तांबे, डॉ. फुलवडे आणि दयानंद डुंबरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ब्रिगेडियर विक्रम बेनके यांनी सांगितले की,
*“देशसेवा हे प्रत्येक तरुणाचे ध्येय असले पाहिजे. जुन्नर तालुक्यात शेतकरी मोठ्या संख्येने आहेत; मात्र जवानांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. जवान आणि किसान हे राष्ट्रनिर्मितीचे दोन मजबूत आधारस्तंभ आहेत. दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केल्यास देशाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल.”*सैन्य नेतृत्वाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “सैनिकांच्या कामगिरीमागे त्यांचे समर्पण आणि मेहनत असते. नेतृत्वाची खरी जबाबदारी म्हणजे सैनिकांच्या यशाचे श्रेय त्यांना देणे.”
*ब्रिगेडियर बेनके यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, भाऊ पत्नी आणि संपूर्ण कुटुंबीयांना दिले.*
*विशेष खास अभिनंदन* म्हणजे, ब्रिगेडियर विक्रम बेनके हे खानदेशातील शेतकरी चळवळीचे झुंजार नेते स्वर्गीय नरेंद्र अहिरे यांचे जावई आहेत. त्यामुळे खानदेशातही त्यांच्या या यशाबद्दल अभिमानाची भावना व्यक्त होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिवनेरीच्या मातीतून घडलेले हे नेतृत्व देशसेवेचे प्रेरणास्थान ठरत असून — “जवानांचा सन्मान आणि किसानांचा अभिमान” हा राष्ट्रनिर्मितीचा संदेश त्यांनी दिला आहे.

तीन वर्षांपासून पत्रकारिता पुरस्कार वितरण रखडले; पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी

२०२१ ते २०२३ चे पुरस्कार अद्याप प्रलंबित; जुन्या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने २०२५ च्या स्पर्धेकडे पत्रकारांची पाठ

नाशिक : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी विविध पत्रकारिता पुरस्कार जाहीर केले जातात. मात्र, सन २०२१, २०२२ आणि २०२३ या सलग तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर होऊनही आजतागायत प्रत्यक्ष वितरण न झाल्याने राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कारणामुळे सन २०२५ च्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेकडे अनेक पत्रकारांनी पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.


१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या वृत्तलेख, दूरचित्रवाणी वृत्तकथा, छायाचित्रण, समाजमाध्यमातील उत्कृष्ट कार्य तसेच स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी विविध पुरस्कारांसाठी शासनाने प्रवेशिका मागवल्या आहेत. या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ मार्च २०२६ होती. मात्र, अत्यल्प प्रतिसादामुळे ही मुदत वाढवून ३१ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली होती. तरीही पत्रकारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळला नव्हता.
यामागील प्रमुख कारण म्हणजे मागील तीन वर्षांचे पुरस्कार अद्याप वितरित झालेले नाहीत. पत्रकारांचे म्हणणे आहे की, “जुने पुरस्कारच मिळाले नाहीत, तर नवीन स्पर्धेत सहभागी होऊन काय उपयोग?” मागील वर्षी जून-जुलैमध्ये २०२१, २०२२ आणि २०२३ च्या पुरस्कारार्थींची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. निकाल जाहीर झाले; मात्र पुरस्कार वितरणाचा सोहळा आजपर्यंत आयोजित करण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाच्या घोषणाच केवळ कागदावर राहिल्याची भावना पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, नाशिक विभागातील तीन वर्षांच्या पुरस्कार वितरणाच्या रकमेसाठी अवघ्या सुमारे २० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. राज्य शासन विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असताना पत्रकारांच्या सन्मानासाठी आवश्यक असलेला हा अल्प निधीही उपलब्ध होत नसल्याने शासनाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनाच शासनाच्या पुरस्कारांपासून वर्षानुवर्षे वंचित ठेवले जात असल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी आहे. पुरस्कार जाहीर करूनही त्यांचे वितरण न होणे ही प्रशासनाच्या उदासीनतेची बाब असल्याची टीका पत्रकारांकडून होत आहे.

याचा परिणाम पुरस्कार स्पर्धेतील सहभागावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. नाशिक विभागात सन २०२१ मध्ये अपेक्षित २० पैकी १६, सन २०२२ मध्ये १३ आणि सन २०२३ मध्ये केवळ १० प्रवेशिका प्राप्त झाल्या. सलग तीन वर्षांत सुमारे २० ते २१ पत्रकारांनी या स्पर्धेकडे पाठ फिरवली असून, शासनाच्या पुरस्कार प्रक्रियेवरील विश्वास कमी होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
राज्यात पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कारासह, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार अशा विविध पुरस्कारांसाठी ५१ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतची रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष पुरस्कार वितरणच होत नसल्याने या योजनांचा उद्देशच फोल ठरत असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांमधून व्यक्त होत आहे.
पत्रकारांची मागणी आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन २०२१, २०२२ आणि २०२३ या प्रलंबित पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण लवकरात लवकर आयोजित करावे. तसेच सर्व प्रलंबित पुरस्कारांचे वितरण करून पत्रकारांचा शासनावरील विश्वास पुन्हा दृढ करावा.
राज्यभरातील पत्रकारांचे लक्ष आता शासनाच्या निर्णयाकडे लागले असून, या वृत्ताची तातडीने दखल घेऊन संबंधित प्रशासनाने पुरस्कार वितरणाची तारीख जाहीर करावी, अशी जोरदार मागणी पत्रकारांकडून होत आहे.

  • संदीप धात्रक, विशेष प्रतिनिधी – संपर्क : ९४२००००९४२
    (दैनिक राष्ट्रउदय )
आरसेटीच्या स्वयंरोजगाराचे ध्वज नाशिकात फडकले !

आरसेटीच्या उपक्रमाने ग्रामीण तरुणाईत उत्साह

नाशिक :
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत कार्यरत महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) या केंद्रात स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा पार पडला. बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

RSETI म्हणजेच Rural Self Employment Training Institute ग्रामीण युवक-युवतींना विविध क्षेत्रात स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याचे कार्य करत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रद्वारे संचालित या संस्थेत कृषी, उत्पादन, प्रक्रिया व सर्वसाधारण उद्योग क्षेत्राशी संबंधित कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत दिले जाते. एवढेच नव्हे तर प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन व निवासाची सोयही संस्थेमार्फत केली जाते.

समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम उद्योजक घडविणे हे आरसेटीचे ध्येय आहे. “तरुणाईने या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे. कौशल्ये अंगीकारून ग्रामीण भागात उद्योगधंदे उभारल्यास स्वतःसोबतच समाजालाही आधार मिळेल,” असे आवाहन झोनल मॅनेजर राजेश देशपांडे यांनी या वेळी केले.

ध्वजारोहण कार्यक्रमाला बँकेचे उपविभागीय व्यवस्थापक बी.बी. बेहेरा, एजीएम (सिपीसी कमर्शियल) उमाकांत केसगिरे, एलडीएम भिवा लव्हाटे, संस्थेचे संचालक गणेश सरोदे, प्रशिक्षक राजेंद्र पवार, चेतन भोये, समीर कुलकर्णी, रवि गावित, भूषण सरोदे यांच्यासह पदाधिकारी, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पवार यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षक दिशा सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. आभार प्रदर्शन समीर कुलकर्णी यांनी मानले.

स्वयंरोजगाराच्या संधी वाढविण्याच्या दिशेने झेप घेणाऱ्या अशा कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील तरुणाईत आत्मविश्वास वाढून समाजाच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

राजु ठाकरे – ९९२१०२०१११

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण व सहायक पोलिस निरीक्षक महेश हिरे यांचा सुवर्णपदकासाठी गौरव – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते

नाशिक, दि. २७ जुलै – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज सकाळी नाशिक रोड येथील दुर्गादेवी मंदिर परिसरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला. या स्मारकाचा जीर्णोद्धार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आला आहे.

या सोहळ्यास आमदार देवयानी फरांदे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री महाजन म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ मंदिरांचे नव्हे, तर घाट, बारव व विहिरींच्या माध्यमातून जलसंवर्धनाचे कार्य केले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारे हे स्मारक प्रेरणादायक ठरेल.”

सहायक पोलिस निरीक्षक महेश हिरे यांचा सुवर्णपदकासाठी गौरव

अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पोलिस आणि फायर स्पर्धा २०२५ मध्ये १० मीटर एअर पिस्टल शुटिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांचा आज दुपारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यास आमदार सीमा हिरे, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका अत्रे, डॉ. आरती हिरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले, “महेश हिरे यांची कामगिरी अत्यंत प्रेरणादायक असून त्यांनी नव्या पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी भविष्यातही आपल्या शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर नव्या पिढीला मार्गदर्शन करावे.”

अतिथी संपादक – संदिप धात्रक – ९४२००००९४२

*कृषी दिनी शिवाजी राजपूत यांच्या वनश्री ऑक्सिजन पार्क मध्ये पाचव्या बांबू प्लांटेशनचा उत्साहात वाढदिवस साजरा*

*कृषी दिनी शिवाजी राजपूत यांच्या वनश्री ऑक्सिजन पार्क मध्ये पाचव्या बांबू प्लांटेशनचा उत्साहात वाढदिवस साजरा*

१ जुलै कृषी दिन शेतीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कै. मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे अवचित साधून पूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवली जातात. मात्र शिरपूर तालुक्यातील भोरखेडा गावातील ‘वनश्री ऑक्सिजन पार्क’ मध्ये एक आगळा -वेगळा पर्यावरण पूरक आणि प्रेरणादायी कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते म्हणजे आदरणीय शिवाजी राजपूत यांच्या बांबू प्लांटेशनचा वाढदिवस होय. यावर्षी १ जुलै २०२५ रोजी या बांबू प्लांटेशनचा ५ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. २०२० साली ५० एकर क्षेत्रावर विविध भागात १९ प्रजातींच्या बांबूची लागवड करून सुरु केलेला उपक्रम आज एक पर्यावरण चळवळ बनून उभा आहे. ह्या कार्यकामाची सुरुवात वाढदिवसाच्या केक आणि फीत कापून करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू, प्रशासन व कृषी विभातील अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. यानंतर वन भोजनाचे आयोजन करून परंपारिक पद्धतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. शिवाजी राजपूत प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. शिवाजी राजपूत हे फक्त वृक्ष मित्र म्हणूनच नव्हे तर ते कृषी मित्र म्हणून ही ओळकले जातात.

त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून संकल्पनेतून निसर्ग संवर्धनाचे काम हाती घेतले आहे, ते अतुलनीय आहे. आज ही प्रत्येकाच्या वाढदिवस वृक्ष लावून साजरा करण्याची त्यांची परंपरा सुरु आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांचे वाढदिवस ते वृक्ष लावून साजरे केले आहेत व करत असतात. हे वृक्ष लागवड केले ही नाही तर त्यांची जतन व संगोपन देखील व्यवस्थित रित्या केली आहे. आणि त्याची दखल राज्य किंवा अंतर राष्ट्रीय स्थरावर ही घेण्यात आली आहे. आज वर त्यांना विविध राज्यशासकीय, केंद्रशासकीय, खाजगी तसेच अंतर राष्ट्रीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे. बांबू लागवड ही पर्यावरनाच्या दृष्टीने फायदेशीर आहे, तितकीच ती शेतकऱ्यांसाठी नविन उत्पन्नाचे स्रोत देखील ठरते असे शिवाजी राजपूत यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.

बांबू म्हणजे हरीत क्रांतीचा नविन अध्याय, त्यातून मिळणारे फायदे हे केवळ पर्यावर्णापुरते मर्यादित नाहीत तर शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक श्वास्वतीचा मार्ग आहे. असे ते म्हणाले बांबू चा विविध प्रजातींमुळे जमिनीची गुणवत्ता सुधरते, पाण्याचे संचयन होते, जमिनीची धूप थांबते आणि त्याचे कागद, इंधन, बांधकाम साहित्य, हस्तकला साहित्य यासारख्या विविध क्षेत्रात उपयोग होतो. हे सर्व पर्यावरण आणि अर्थ व्यवस्थेत पूरक आहे.’वनश्री ऑक्सिजन पार्क ‘ केवळ बांबू लागवडी पुरता मर्यादित न राहता पर्यावरण शिक्षण केंद्र, शालेय शिक्षण सहलिंचे आकर्षण आणि शेतकऱ्यांसाठी बांबू प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास आलेल आहे. शिवाजी राजपूत यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. कि एकटा माणूसही आपल्या संकल्पनेतून जंगल फुलवू शकतो एक मानवनिर्मित जंगल उभे केल आहे

या कार्यक्रमासाठी यशस्वी आयोजनाचे स्थानिक, ग्रामस्थ, शेतकरी बांधव यांचे मोठे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी, सामाजिक वनकरण विभागाचे राधिका फलफले, वन विभागाचे अधिकारी भूषण पाटील, शिरपूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी थाळनेर सहाय्यक पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, शिरपूर न.परिषदचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, गट विकास अधिकारी प्रदिप पवार, कृषी अधिकारी योगेश गिरासे, राजेश चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन नरेंद्रसिंग सिसोदिया, चार्टर्ड अकाउंटंट अंकित शेवाळे, उद्योजक प्रसाद पाटील, भोरखेडा गावाचे उपसरपंच प्रशांत राजपूत, सहाय्यक गट विकास अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी वैशाली गिरासे, शितल गिरासे, पत्रकार महेंद्र राजपूत, प्रमोद राजपूत, युवराज भाऊसाहेब,महेश गिरासे, संग्रामसिंग पवार यासह मित्र परिवार आणि शेतकरी बांधव उपस्थित होते

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची सायकल स्वारी – सायबर सजगतेचा जागर मंत्र ! सिन्नरपर्यंत सोबत वारी

नाशिक, १९ जूनगोल्फ क्लब मैदान, नाशिक येथून सुरू झालेल्या नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या पंढरपूर सायकल वारीत यंदा एक आगळा-वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्वतः सायकलवर स्वार होत नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वारीत सहभागी होत सिन्नरपर्यंतचा प्रवास सुरू केला.

या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे – सायकलवर लावलेली सायबर सुरक्षेविषयी जागृती करणारी पोस्टर्स, ज्यामध्ये “OTP शेअर करू नका”, “बँक खात्याची माहिती गुप्त ठेवा”, “सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा” असे स्पष्ट संदेश देण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक सजग समाजाच्या वारीत सहभागी!

बाळासाहेब पाटील यांनी या उपक्रमात निव्वळ शुभेच्छा देणाऱ्या अधिकार्‍याची भूमिका न बजावता, स्वतः सायकल हाती घेत वारीमध्ये सहभागी होऊन एक सजग नेतृत्व दाखवले.
वारीतील प्रत्येक सायकल जनजागृतीचं एक वाहन ठरत असून, नागरिकांच्या नजरेतून या पोस्टर्समुळे सायबर सुरक्षेबाबतचा स्पष्ट जनसंवाद साधला जात आहे.

वारी ही सजगतेची वाटचाल” पोलीस अधीक्षकांचा संदेश

“आजच्या युगात फसवणुकीचे प्रकार इतके स्मार्ट झालेत की प्रत्येक नागरिकाने सायबर सजग राहणं गरजेचं आहे. वारीसारख्या धार्मिक व सामाजिक चळवळीचा वापर समाजप्रबोधनासाठी करणे आवश्यक आहे,”
– बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक

पोलीस विभाग लोकांमध्ये मिसळतोय उदाहरण ठरलेलं नेतृत्व

सिन्नरपर्यंत सायकल चालवत जाणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या सहभागामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
त्यांचा हा पुढाकार युवक, विद्यार्थी आणि नागरी संस्था यांच्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

वारीतील सायकल पोस्टर्स जनसंवादाचे चालतेबोलते माध्यम

ही वारी म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धा नव्हे, तर चलती जनजागृती मोहीम आहे. प्रत्येक सायकलवरील पोस्टर नागरिकांपर्यंत पोहोचत असून, लोक संवाद न करता देखील जागरूकतेचा स्पष्ट संदेश ग्रहण करत आहेत.
हेच या उपक्रमाचं मोठं यश ठरत आहे.

सामाजिक जबाबदारीची सायकल वारी!

भक्ती, आरोग्य, पर्यावरण, सायबर सुरक्षा आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन यांचा अनोखा संगम असलेली ही वारी —
एक सजग समाज घडवण्याच्या दिशेने नाशिककडून पंढरपूरकडे निघालेली आदर्श यात्रा ठरेल.

 

हरीश बैजल सपत्नीक फुगडी खेळले – प्रेम, पोलीस आणि पारंपरिक उत्साहाचा संगम!

कार्यक्रमातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते निवृत्त पोलीस आयुक्त हरीश बैजल व त्यांच्या पत्नीने खेळलेल्या पारंपरिक फुगडीने!
बैजल दाम्पत्याने नागरिकांसह खुल्या दिलाने फुगडी खेळून एक आपुलकीचा, संवादमूल्याचा क्षण तयार केला.
त्यांचा सहज, आनंदी सहभाग पाहून नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि अनेकांनी तो क्षण मोबाईलमध्ये टिपून घेतला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

  • जिल्हाधिकारी जलज शर्मा
  • महापालिका आयुक्त मनीषा खत्री
  • निवृत्त पोलीस आयुक्त हरीश बैजल व सौ. बैजल
  • नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील
  • महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संजय बारकुंड
  • पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव
  • सायबर पोलिस स्टेशनचे सुभाष ढवळे
  • विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते

 

अतिथी संपादक – संदिप धात्रक, नाशिक – ९४२००००९४२

सुनिल रमेश आसापुरे यांची आई कै. कुसुमताई रमेश आसापुरे दुख:द निधन

*⚫शोक संदेश ⚫*
*सूर्यवंशी( बारी )समाजातील सर्व समाज बांधव आणि आप्तेष्ट नातेवाईक यांना कळविण्यात येते की, शिरपूर येथील श्री. सुनिल रमेश आसापुरे यांची आई कै. कुसुमताई रमेश आसापुरे वय- ७४ वर्ष यांचे दि.०३/११/२०२४ वार रविवार रोजी सकाळी ३:४५ वाजता अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा दि.०३/११/२०२४ रोजी दुपारी ०२:०० वाजता राहते घर ४अ, कुसुमव्हीला, ओम नगर आशिर्वाद हॉस्पिटलच्या मागे शिरपूर येथुन निघेल याची सर्वानी नोंद घ्यावी ही विनंती 🙏😥*

*💐आपले शोकाकुल 💐*
*श्री. सुनिल रमेश आसापुरे (मुलगा)*
*श्री. राजेश रमेश आसापुरे (मुलगा)*

*समस्त आसापुरे परिवार शिरपूर*

शिरपूरमध्ये 2 नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने योग विद्या धाम संस्थेतर्फे विशेष ‘पाडवा पहाट संगीत मैफिल’ कार्यक्रमाचे आयोजन
  • शिरपूर: दीपावलीच्या मंगल पर्वानिमित्त योग विद्या धाम, शिरपूर, शहरातील संगीतप्रेमी रसिकांसाठी एक अद्वितीय ‘पाडवा पहाट संगीत मैफिल’ कार्यक्रम सादर करीत आहे. या सांस्कृतिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांचे शिष्य आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द गायक डॉ. निरज लांडे (अकोला) आणि त्यांच्या सहकार्यांच्या सुश्राव्य गायनाची सादरीकरण.

कार्यक्रमात भावगीते, भक्तिगीते, भजने यांसारख्या हृदयाला भिडणाऱ्या संगीत प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार असून, रसिकांसाठी हे एक संगीतमय पर्व ठरणार आहे. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, तसेच माधवराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘पाडवा पहाट संगीत मैफिल’ हा कार्यक्रम 2 नोव्हेंबर 2024 रोजी, सकाळी 6.15 ते 8.15 या वेळेत राजगोपाल भंडारी हॉल, आर.सी. पटेल मुख्य इमारतीत संपन्न होईल. शिरपूरच्या सांस्कृतिक इतिहासात हा असा पहिलाच मोठ्या प्रमाणावर सादर होणारा कार्यक्रम आहे. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्याचे आवाहन योग विद्या धाम संस्थेच्या संचालकांनी केले आहे.

Read More शिरपूरमध्ये 2 नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने योग विद्या धाम संस्थेतर्फे विशेष ‘पाडवा पहाट संगीत मैफिल’ कार्यक्रमाचे आयोजन